शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोदींनी लुबाडले- शरद पवारांची टीका...
- MahaLive News
- May 18, 2024
- 2 min read
या देशातील जल, जमीन जंगल वाचविण्याचे काम आदिवासी बांधवांनी केले असतानाही भाजपवाले त्यांना वनवासी म्हणून संबोधत आहेत, मात्र तेच खरे या देशाचे मालक असून या आदिवासींचा सन्मान करण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत भास्कर भगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली आहे. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोदी सरकारने लुबाडले आहे. तुमचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी भगरेंना निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. नाशिक जिल्हा हा क्रांती करणारा जिल्हा आहे. ८० च्या दशकात मी या जिल्ह्यात फिरलो. याच जिल्ह्याने आमचे सर्व आमदार निवडून दिले, हा इतिहास असल्याचे सांगत त्याचप्रमाणे आपण भास्कर भागरे यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रचार सभा मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पार पडली.
उमेदवार भास्कर भगरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार जगन्नाथ धात्रक. अनिल आहेर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, आमदार नरेंद्र दराडे, श्रीराम शेटे, रोहिणी खडसे, माणिकराव शिंदे, गणेश धात्रक, डॉ. डी. एल. कराड, विठ्ठल शेलार, श्री. कराळे, हेमंत टकले, संतोष बळीद व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. देशांमध्ये अल्पसंख्याकांच्या बद्दल मुलाखतीमध्ये वेगळे सांगायचं आणि निवडणुकीच्या भाषणामध्ये अल्पसंख्याकांबद्दल एकदम टोकाचे उद्गार काढायचे हे सगळं गणित भाजपचे आहे. मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष यांनी फोडून मराठी माणसाला संपवण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप करून नांदगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार आपलाच असला पाहिजे असे आवाहन केले.
'मला जी उमेदवारी मिळाली, ती माझी नाही, ती तुमच्या सर्वांची आहे. वीस वर्षापासून भाजप खासदार आहे, सत्ता आहे पण या मतदारसंघात एकही विकासकाम झाले नाही. पाच वर्षे ज्यांना संधी दिली, त्यांनी कधीही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत. कांद्याची निर्यातबंदी झाली, आंदोलने झाली, तेव्हाही खासदार गप्पच होते, त्यामुळे दिंडोरी, नांदगाव, निफाड आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याचे भास्कर भगरे यांनी सांगितले. 'ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात, त्यावर जास्त जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे हे शेतकरी विरोधी सरकार आहे. खोटे बोलणार सरकार आहे. विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम भाजप करत आहे. सोरेन, केजरीवाल, राऊत यांना खोट्या केस करून जेलमध्ये टाकले, अशांना चुकीनेही पुन्हा संधी देऊ नका असे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 'आरोग्य मंत्री म्हणून काम मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. कोविड काळात नाशिक, मालेगाव येथे हॉस्पिटलला भेट दिल्या. केंद्राने रेमेडिसिव्हर तसेच ऑक्सिजन लवकर मिळू दिला नाही. गुजरातला मदत दिली जात होती, मात्र महाराष्ट्राला साथ मिळाली नाही. केंद्र तेव्हा बेजबाबदारपणे वागले. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन राजेश टोपे म्हणाले. आम्ही केलेल्या विकास कामांचे श्रेय विरोधक घेत असून ही त्यांची सवयच आहे अशी टीका गणेश धात्रक यांनी केली.
Kommentare