विनोद पाटलांची मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव; पुनर्विचार याचिका दाखल...
- MahaLive News
- Jun 20, 2021
- 2 min read

मुंबई - मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही दाखल केली असून न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. दरम्यान, काही निरीक्षणे नोंदविण्यात आली. तसेच आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवता येणार नसल्याचे नमूद केले. आणीबाणीची स्थिती सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली होती. हे नियमांचे उल्लंघन होते. परंतु परिस्थिती तशी नव्हती, असे घटनापीठाने म्हटले होते. तसेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण का द्यावे? याबाबत गायकवाड समितीनेही काहीच स्पष्ट केलेले नाही. गायकवाड समितीच्या अहवालात त्याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असे न्यायमुर्ती अशोक भूषण यांनी सांगताना, राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे म्हटले.

मात्र, या निर्णयामुळे वैद्यकीय प्रवेशातील आरक्षणावर काहीही परिणाम होणार नाही, असेही कोर्टाने नमूद केले. न्यायमुर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वरा राव, एस. अब्दूल नाझीर, हेमंत गुप्ता आणि एस. रवींद्र भट या पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे झालेल्या सुनावणीवेळी मत मांडण्यात आले. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी यावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. तसेच मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणीही या याचिकेत केल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याआधीच पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात खासदार संभाजी छत्रपती यांनी दौरा काढला. मुख्यमंत्र्यांपासून ते सर्व पक्षीय नेत्यांची यावेळी त्यांनी भेट घेऊन आरक्षणावर चर्चा केली. कोल्हापुरात त्यानंतर मूक मोर्चाचे आयोजनही केले. अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहून आरक्षणासंदर्भात भावना मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजी राजे यांची सह्याद्री वसतीगृहात महत्वपूर्ण बैठक झाली. मराठा समाजाला सवलती देण्याबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू झाल्याचे संभाजी राजे म्हणाले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Comments