राज्यातील ही दुकानं आता आठवड्यातील 7 दिवस सुरू राहणार; राज्य सरकारची मोठी घोषणा - वाचा सविस्तर...
- MahaLive News
- May 2, 2021
- 1 min read

#मुंबई- महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच सध्या राज्यामध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत खाद्यपदार्थांची दुकानं, किराणा दुकान तसेच शेती साहित्याची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. शनिवार-रविवार संपूर्ण राज्यभरात वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश सरकारतर्फे जारी करण्यात आले. शनिवार आणि रविवार मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापना संपूर्णतः बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश होते. परंतु आता या आदेशांमध्ये बदल करून राज्य सरकारने काही दुकानं आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवार चिकन,मटन भेटत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर विकेंडलाही चिकन, मटण, पोल्ट्री तसेच इतर अन्नसंलग्न गोष्टी सुरू ठेवण्याचे आणि त्याच्या मालाची वाहतूक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत. चिकन मटणसह आंब्याची दुकानंही आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार असून त्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ देण्यात आलेली आहे. त्याबरोबरच 11 नंतर घरपोच डिलिव्हरी देण्याला परवानगी असणार आहे. राज्य सरकारतर्फे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. तसेच राज्य सरकारने यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments